तुंग किल्ल्याची माहिती (Tung Fort / कठीणगड)
Tung kilyachi mahiti marathi madhe
📍 स्थान :
महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात खंडाळा व लोणावळा येथून जवळच पश्चिम घाटात म्हणजेच सह्याद्री पर्वतात तुंग हा किल्ला आहे.
या किल्ल्यास कठीणगड या नावाने ओळखले जाते.
📏 उंची :
समुद्र सपाटीपासून हा किल्ला ३५२६ फूट म्हणजेच १०७५ मीटर उंचीवर आहे.
🚍 तुंग किल्यावर जाण्यासाठी प्रवासी वाहतूक मार्ग :
मुंबई व पुणे ही आंतरराष्ट्रीय ठिकाणे आहेत.
मुंबई येथून लोणावळा व तेथून आंबी व्हॅली रोडने घुसळखांब, तेथून जावन तुंगी मार्गाने पुढे तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमंत मंदिरापर्यंत खाजगी वाहनाने जावे लागते व तेथून पायी चढून किल्ल्यावर जावे लागते.
पुणे येथून पिंपरी–चिंचवड मार्गे खंडाळा–लोणावळा येथून तुंग किल्ल्यावर जाता येते.
लोणावळा येथून तुंग किल्ला २६ किलोमीटर अंतरावर आहे.
पुणे येथून तुंग किल्ला ६७ किलोमीटर अंतरावर आहे.
👀 तुंग किल्यावर पाहण्यासाठी योग्य ठिकाणे :
🚗 हनुमंत मंदिर परिसर :
खाजगी वाहनाने जावन–तुंग रोडने आपण किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमंत मंदिर परिसरात येऊन पोहोचतो. तेथे गाडी पार्क करून हनुमंत दर्शन घेऊन आपण गडफेरीस सुरुवात करू शकतो.
🛕 हनुमंत मंदिर :
गडाच्या पायथ्याशी आपल्याला नवीन बांधणीचे हनुमंत मंदिर पाहायला मिळते. शेंदरी रंगात रंगवलेली सुरेख मूर्ती पाहताच मन भारावून जाते.
हनुमंत ही देवता संकटमोचन असल्याने व बलोपासक असल्याने प्रत्येक किल्ल्यावर व परिसरात आपणास तिची स्थापना केलेली दिसून येते.
⚔️ वीरगळ :
वाटेने पुढे गेल्यावर आपल्याला एकाच जागी सलग लागून ठेवलेल्या वीरगळ पाहायला मिळतात. युद्धात पराक्रम गाजवत स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी वीरगती लढताना पावलेल्या वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ या वीरगळ उभारल्या जातात.
तुंग किल्ल्यावर स्वराज्य काळात आलेल्या आक्रमणास परतवून लावणाऱ्या हिंदू योद्ध्यांच्या स्मरणार्थ या उभ्या केलेल्या आहेत.
या वीरांनी महाराष्ट्र देश, धर्म, स्त्री, गोमाता व परिसराचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली याचे या वीरगळ प्रतीक आहेत.
त्या विखुरलेल्या अवस्थेत होत्या. त्या एकत्र करून जतन करण्यासाठी सह्याद्री दुर्ग प्रतिष्ठानच्या घाटी मावळ्यांनी त्यांची येथे प्रतिष्ठापना केली आहे व इतिहासाची माहिती नवीन पिढीला सांगण्याचा मार्ग खुला केल्याचे दिसून येते.
या वीरगळींना नमन करून पुढे गडाकडे खड्या चढाईसाठी सुरुवात करण्यासाठी प्रेरणा मिळते.
🧗♂️ खडा पायरी मार्ग :
वीरगळ पाहून पुढे खडा चढ चढून आल्यावर आपणास पायरी मार्ग लागतो. ब्रिटिश आक्रमणानंतर व पावसाने मोठी घळ पडून हा मार्ग नष्ट झाला होता. तो अलीकडे दुरुस्त करून नवीन निर्मिती केल्याचे दिसून येते.
तसेच शिवकालीन पायरी बसवलेली आपणास पाहायला मिळते. त्या पायरीचे नाव स्वराज्य पायरी आहे.
वर चढून जाण्यासाठी खडतर प्रवास करावा लागतो. अत्यंत कठीण चढ आहे. जागोजागी रॉड व दोर बसवलेले आहेत. त्यांचा आधार घेत आपण वर जाऊ शकतो.
🛕 चपटदान मारुती लयन मंदिर :
गड चढून जाताना आपणास वाटेत एका खडकात खोदलेले मारुती मंदिर लागते. आतमध्ये शेंदरी रंगात रंगवलेली सुरेख मूर्ती पाहायला मिळते.
💧 पाण्याचे टाके :
मारुती मंदिरापासून जवळच आपल्याला एका खडकात खोदलेले पाण्याचे टाके पाहायला मिळते.
🛖 लयन देवडी :
थोडे वर गेल्यावर आपल्याला एक पहारेकरी राहण्यासाठी खोदलेली देवडी पहायला मिळते. आजही तिचा वापर गिर्यारोहक व गडप्रेमी विश्रांती घेण्यासाठी करतात.
⚔️ रणमंडळ वाट :
किल्ल्याच्या दरवाजाकडे जाताना आपणास एकीकडे उंच कडा तर दुसरीकडे खोल दरी व मधून एक लहान पायवाट असलेली जास्तीत जास्त दोनच माणसे जाऊ शकतील अशी वाट लागते. ही रणमंडळ वाट आहे.
किल्ल्याच्या दरवाजाकडे शत्रू चालून आल्यास त्यांना हरवणे सोपे जाते. कड्यावरून दगडांचा मारा करता येतो व कमी संख्येने पुढे येणारे सैन्य कापून काढता येतात. शत्रूला जोराचा हल्ला करता येत नाही.
🚪 मुख्य प्रवेशद्वार :
रणमंडळ वाटेने पुढे गेल्यावर आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते. खडकातील पाणी टाकी खोदताना काढलेले दगड व इतर खडक फोडून घडवलेल्या दगडांनी बनवलेले अग्निजन्य काळ्या खडकातील तासीव दरवाजा लक्ष वेधून घेतो.
बाजूच्या पायरी व इतर भागाचा जीर्णोद्धार केल्याने प्राचीन वैभव पुन्हा प्राप्त झालेले आहे.
🛡️ चिलखत बुरुज :
गडाच्या दरवाजाच्या बाजूने लहान पायवाटेने सरळ गेल्यावर दुसऱ्या बाजूस असलेल्या डब्बल चिलखती बुरुजाकडे जाता येते. काळाच्या ओघात दुर्लक्ष झाल्याने बरीचशी पडझड झालेली आहे. तरी देखील अजूनही सुस्थितीत हा बुरुज आढळतो.
दुहेरी तटबंदी असलेला हा बुरुज टेहळणीसाठी व शत्रूच्या हालचाली टिपण्यासाठी योग्य आहे.
🚪 बुरुजातील जीभीचा दरवाजा :
मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्याला खडा पायरीमार्ग लागतो. तेथून आपल्याला बुरुज दिसतो. वर चढून गेल्यावर चंद्रकृती वळण असलेले स्थान दिसते. आतील बाजूस एक दरवाजा पहायला मिळतो. हा जीभीचा दरवाजा आहे.
या दरवाजासमोरील बुरुजात हनुमंत मूर्ती कोरलेली पाहायला मिळते.
🛖 पहारेकरी देवड्या :
आतील बाजूस आपल्याला पहारेकऱ्यांना विश्रांतीसाठी बांधलेल्या देवड्या पहायला मिळतात. यामध्ये शिबंदीतील सैनिक विश्रांती घेत असत.
🛕 गणेश मंदिर :
जीभी दरवाजातून आत वरील बाजूस गेल्यावर आपणास उंच जागी गणेश मंदिर पाहायला मिळते. साध बांधणीत असलेले हे मंदिर तत्कालीन प्राचीन काळाची आठवण करून देते. अलीकडे याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
💦 पाण्याचे खोदीव तळे :
शिवकाळात डोंगराच्या पाण्याचा मार्ग पाहून सखल भागात पाण्याच्या मार्गावर खोदून कात्याळ तळे खोदलेले दिसते.
गडावरील पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी यांची रचना करण्यात आली होती.
यातून काढलेले दगड तटबंदी व इतर इमारती बांधण्यासाठी वापरले जात.
या तलावाशेजारी अनेक रानकेळी उगवलेल्या पाहायला मिळतात.
🏯 बालेकिल्ला :
गडाच्या वरील बाजूस छोट्या पायवाटेने खड्या चढाई वाटेने चढून जाताना जागोजागी पाण्याची टाकी खोदलेली दिसून येतात.
🚩 बालेकिल्ला ध्वज :
गडाच्या वरील शिखर टोकावर आपल्याला ध्वजस्तंभ पहायला मिळतो.
🛕 तुंगाई देवी मंदिर :
गडाच्या उंच उत्तुंग बालेकिल्ल्यावर आपणास एक छोटेसे जीर्णोद्धार केलेले मंदिर पाहायला मिळते. ते तुंगाई देवीचे मंदिर आहे.
या देवीच्या नावानेच या किल्ल्याला तुंग असे नाव दिले गेले आहे.
🏚️ इतर अवशेष :
किल्ल्यावर जागोजागी आपल्याला पडलेल्या वाड्यांचे व इतर बांधकामांचे अवशेष पाहायला मिळतात.
📜 तुंग किल्ला (उर्फ कठीणगड) – ऐतिहासिक माहिती :
सदर किल्ल्यावर खोदलेल्या गुहा या सातवाहन काळातील आहेत.
पूर्वी हा परिसर सातवाहन व यादव या हिंदू राजवटींच्या ताब्यात होता.
या काळात येथे लांब गुहा व पाण्याच्या पौडी म्हणजेच टाक्या खोदल्या गेल्या.
कोकणात होणाऱ्या पवन मावळातील व्यापारी मार्गावर टेहळणी करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केल्याचे दिसते.
इसवी सन १४८२–८३ काळात सय्यद अली तबतबा याने लिहिलेल्या पारशी ग्रंथ बुऱ्हाण–ए–मासरी मध्ये या परिसराचा तुंग अरण्य असा उल्लेख आढळतो.
इसवी सन १४८२–८३ साली मलिक नायब याचा मुलगा अहमद याने जुन्नर व कोकण प्रांत जिंकला व तुंग परिसर बहामनी सत्तेच्या अमलाखाली आला.
यादव व बहामनी काळात हा किल्ला असणारा डोंगर टेहळणी ठाणे म्हणून वापरात होता.
बहामनी सत्तेच्या विभाजनानंतर हा किल्ला निजामशाहीत आला.
कोकण व्यापारी मार्गावर देखरेख करण्यासाठी येथे टेहळणी छावणी उभारण्यात आली.
इसवी सन १६३६ साली निजामशाही नष्ट झाल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीत आला.
इसवी सन १६५६ साली छत्रपती शिवरायांनी मावळ प्रांत ताब्यात घेतल्यानंतर हा किल्ला स्वराज्यात सामील केला.
४ सप्टेंबर १६५६ रोजी अनेक किल्ल्यांची नावे बदलली गेली.
किल्ल्याचे अवघड स्थान पाहून त्याला कठीणगड हे नाव देण्यात आले.
इसवी सन १६६५ साली मिर्झाराजे जयसिंगाच्या पुरंदर वेढ्यावेळी दिलेरखानाने तुंग परिसरातील खेडी लुटली पण किल्ला जिंकता आला नाही.
पुरंदर तहानुसार इसवी सन १६६५ साली तुंग किल्ला मुघलांना देण्यात आला.
आग्रा येथून सुटका झाल्यावर छत्रपती शिवरायांनी पुन्हा हा किल्ला स्वराज्यात घेतला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इसवी सन १७०४ साली मुघलांनी घेरा घालून किल्ला घेतला.
अमानुल्ला खान उर्फ अलीवर्दी खान याची येथे नियुक्ती झाली व त्याने किल्ल्याचे नाव बंकिगड ठेवले.
पुढे तिकोणा (वितंडगड) किल्लेदार करतालदास याचा मुलगा कुवरमल व नंतर अभयराम किल्लेदार होता.
इसवी सन १७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांनी किल्ला स्वराज्यात आणला.
पेशवे श्रीमंत बालाजी विश्वनाथ यांच्या सल्ल्याने हा किल्ला छत्रपती शाहू महाराजांच्या स्वाधीन करण्यात आला.
इसवी सन १८१८ मध्ये ब्रिटिश अधिकारी कर्नल प्रीथर याने तोफमाऱ्याने किल्ला जिंकून पायऱ्या फोडल्या व नासधूस केली.
पुढे किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात दिला गेला.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर भोर संस्थान भारतात विलीन झाल्यावर हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात आला.
भारत सरकारचा पुरातत्व विभाग, शिवरायांना मानणारे दुर्गप्रेमी, सह्याद्री प्रतिष्ठान व स्थानिक लोक यांच्या मदतीने येथे संवर्धनाचे काम सुरू आहे.
✨ अशी आहे तुंग (कठीणगड) किल्ल्याची सविस्तर ऐतिहासिक माहिती.
Tung killyachi mahiti marathi madhe

















